Tuesday, November 10, 2020

चिरविश्रांती

 


 


 

            आज जेव्हा कधी भूतकाळाच्या गोधडीत मी शिरतो. तेव्हा निसटलेल्या क्षणाची काजळी डोळ्यात साचते. तू गेल्यापासून जवळपास चाळीस वर्षे ह्या अनोळखी रात्रीचा मी धनी झालो.पत्त्यांच्या डावाप्रमाणे आयुष्याची घडी विस्कळीत            झाली .आठवणीचे वारस तेवढे शिल्लक आहेत.तीन भेटींच्या  पलीकडे आहे तो फक्त पूर्णविराम.कधी कधी प्रश्न पडतो पहिल्या  भेटीपासूनच आपण तुटत गेलो का?

        बी.ए च शेवटचं वर्ष.आपली अंतिम परीक्षा जवळ आली तेव्हा मी थोडासा नाराज झालो. कॉलेजचं जीवन संपणार ह्याची घंटा वाजली होती. इतिहासाचा अखेरचा पेपर देऊन मी परतू लागलो.लाकडी पूल दिसताच मनाला हायस वाटलं.पूल ज्या ठिकाणी जमिनीला स्पर्श करतो त्यापासून थोड्या अंतरावर गंगाराम काकांची चहाची टपरी  आहे .तिथे चहा पिताना पुलाखालाची वासंती नदी बघून मन हंसासारखं मोहरून जात असे.आभाळ हळूहळू काळवंडू लागलं.वादळ येण्याची शक्यता वाटू लागली.मी लगबगीने पावले टाकू लागलो. समोरून कुणीतरी येत असल्याचा भास झाला.मी बघीतल, समोरून कस्तुरी येत होती.पांढराशुभ्र सलवार घालून नुकतीच एखादी परी अवतरल्याचा भास जाणवत होता. पण कुणास ठावूक ती दिसल्यावर मनात प्रचंड खळबळ माजत असे.तिची माझी नजरानजर झाली.मी काहीसा कचरलो,ती पुढे आली.                                      

" वसंत पेपर कसा गेला "                                                         तिने कपाळावर आलेली केसाची बट मागे सारत विचारलं.             मी तिच्याकडे बघू लागलो.गौरवर्ण चेहरा,कौलारू भुवया, आकाशगंगेसारखे डोळे आणि दुमडलेले ओठ.एकप्रकारची तेजस्वी शांतता तिच्या चेहऱ्यावर पसरलेली होती.

" छान. तुझा " मी बोलता झालो.

" बऱ्यापैकी " तिने माझ्या डोळ्यात बघितले.

" तुला चहा प्यायला आवडेल " ती म्हणाली.

" तुला आवडणार नाही "

  मी दोन चहा मागितले.

" मी गावाला जाणार आहे " तिने चहाचा घोट घेतला.

" कायमची..." चहाची प्रखर उष्णता तोंडाला भाजत गेली.

" तू थांबवू शकतोस " तिचे शब्द आचके देऊ लागले.

" काका किती पैसे झालेत " ती पैसे द्यायला गेली.

  माझे डोळे पाणावले होते.

" परत येशील ना " मी विचारलं.

" तू थांबशील "

  आणि ती ऑटोत बसली.


            भूतकाळात प्रवेश करण्याची ताकद असती तर मी ह्या ठिकाणी नक्कीच वापरली असती.वास्तविक पाहता माझ्या आयुष्याची सुरुवातच अखेरीस झाली. तिच्या जाण्याची जखम दिवसेंदिवस चिघळत गेली. पाच वर्षाच्या वियोगात प्रीतीच्या अग्निकुंडात मी भाजून निघालो.तीला जाऊ दिल्यापासूनच ती मला हवीहवीशी वाटू लागली.तिच्या शेवटच्या शब्दावर माझे अश्रू बाहेर आले,तेव्हा ती ऑटोत बसली.हा संकेत होता दुसऱ्या भेटीचा.

              दरवाजावर थाप पडली.मी बाहेर आलो.कस्तुरी उभी     होती.नववधुसारखी भासत होती.नाही ती नववधूच होती.तिने लग्नाची निमंत्रण पत्रिका समोर केली.

" एकटाच राहतोस ".. ती सोफ्यावर बसली

" तू गेल्यापासून ".....मी उत्तरलो

" पाणी घे "....मी ग्लास समोर केला 

  तिने डोळे पुसले.

" अखेर तू आलीसच "

" हो ".. तिचे अश्रू निरागस भासले

" पण मी तर केव्हाचा थांबून होतो..... "

 

  


               तुटण्याची शृंखला पहिल्या भेटीपासून सुरू झाली तरी मोडल्या मात्र दुसऱ्या भेटीत गेलो. त्यांनतर येणारी प्रत्येक रात्र मृत्यूचा पेला घेऊन येते व तो मी हसतमुखाने प्राशन करतो .जवळपास रोजच मरणाचे घडे साठवीत होतो.कुठलाच ताळेबंद मी बांधू शकत नव्हतो ना तीच्या भेटण्याचा ना जाण्याचा.ज्यावेळी तिने घराचा उंबरठा ओलांडला त्यावेळी माझ्या शरीराने प्राण सोडला.

          मुसळधार पावसाने हैरान  केल होत .मी कितीदा तरी दार लावलो तरी वादळी पावसाने ते उघडूच लागलं.एक जोराची वीज कडाडली आणि पटदिशी दरवाजा उघडला.मी तडक दार लावण्यास गेलो. समोर कस्तुरी.

"आत घेशील "                                                                   पावसाने तीच सर्वांग भिजल होत चेहऱ्यावरून पावसाचे थेंब ओघळून खाली पडू लागले.मी तिला आत घेतलं सोफ्यावर बसविल 

" तू बैस इथं मी टॉवेल घेऊन येतो "..                                              

" नको असू दे " 

" अग सर्दी होईल आजाराने ग्रस्त होशील "

" नाही फक्त तू इथं बैस "

तिने माझा हाथ पकडला. मी तिच्याकडे पाहिलं, नयनात असलेल्या व्याकुळतेची तीव्रता मला सहन झाली नाही.

मी खाली बसलो.

" जवळ येऊ बस ना "

तिने माझा हाथ अजून पण सोडला नव्हता.

" मला मिठी मारू शकतोस "

पौर्णिमेच्या चांदनी प्रमाणे तिची चर्या झळाळू लागली.

" मला अधिकार आहे "

" हो फक्त तुलाच आहे "

   

            मी तिला बाहुत घेतलं. महादेवाचा तांडव निद्रिस्त झाल्यासारखा वाटला.महासागराला चिरविश्रांती लाभली होती. तिच्या शरिराचा प्रत्येक अवयव माझ्या शरीरात प्रवेश करु लागला. ते आता अवयव नसून स्वतंत्र आत्मे झाले होते.मी तिच्या केसांवरून हाथ फिरविला. वादळ शमल होत.मृत्यूने केव्हाच तिला आपलस केलं होतं.


              निसर्गा ! कुठल्या पापाची फळे मी भोगत आहे ! कुठल्या ! तूच या खेळाचा सूत्रधार आहेस तर आम्हाला डाव का मांडू दिलास ! अर्ध्यातच खेळ संपवायचा होता तर एकाचाच बळी का ! ही सततची नरक यातना माझ्याच वाट्याला का ! नाही रे नाही सहन होत आहे ही कुचंबणा ! आता तरी मला निर्वाणाचा शाप दे रे ! होऊ दे एकदाची ह्या दुबळ्या देहाची राखरांगोळी ! मिळू दे परत एकदा चीरविश्रांती ! चिरविश्रांती !



2 comments:

प्रश्न

       दिवसागणीक सरणारी रात्र आता मला छळते आहे. इतका मनस्ताप  कधीच मला झाला नव्हता. संध्याकाळ झाली की मी लिहायला बसायचो आणि सोबत प्यायलासुध्...