निर्वाणाच्या पायथ्याशी...
Sunday, January 16, 2022
प्रश्न
Sunday, August 15, 2021
जाग
कुठल्या तरी अवाढव्य दगडाला धडक बसली आणि मी जागा झालो.डोळे चोळले आणि समोर बघितलं.सूर्याच्या लक्ख प्रकाशाने दाही दिशा उजळून निघाल्या होत्या. हळूहळू प्रकाश ओसरू लागला.समोरच दृश्य स्पष्टपणे दिसल आणि मला हादरा बसला. परत एकदा मी डोळे चोळले पण समोरच दृश्य तेच होत.
दूरवर पसरलेल्या सपाट अश्या मैदानात माणसेच माणसे दिसत होती.स्त्री,पुरुष,मुलं ,म्हातारे सर्व सर्व.पण पूर्णतः नग्न.एकाच्याही अंगावर कपडा नव्हता.मला खूप अश्लील आणि गलिच्छ वाटलं.काय आहे हा प्रकार.सर्व एकजात नग्न.मात्र त्यापैकी कुणाच्याच चेहऱ्यावर दुःखाचा साधा लवलेश नव्हता.सर्वजण आंनदि,समाधानी आणि हसत खिदळत दिसत होते.थोडेफार दुःखी सुद्धा होते पण ते दुःख सुद्धा विलक्षण मोहक वाटत होत.पण मला हे फार भयंकर आणि विचित्र वाटलं.आपण वेगळ्या ग्रहावर तर आलो नाही आणि हे सर्व एलियन तर नसावेत.पण ह्यांना तर माणसा सारखेच अवयय आहेत.
हाथ,पाय ,डोळे ,कान,नाक..चित्र विचित्र असे शेपटी बीपटी सारखे अवयव दिसत नव्हते.भावनाही माणसा सारख्याच होत्या.म्हणजे हे पूर्णपणे माणसच आहेत म्हणायच.मग हे असे उघडे का.?
माझ डोक ठणकायला लागलं होतं आणि त्यांचे ते नग्न देह बघून काहीस किळसवाण वाटत होत.अचानक माझ्यासमोरून एक माणूस गेला.त्याच्या नजरेला न भिडता मी विचारलं.
"दादा ही जागा कोणती आहे"
तो म्हणाला "पृथ्वी"
मी थोडासा गोंधळून म्हणालो,
"हो, पण पृथ्वीवरची नेमकी कोणती, काय नाव ह्या जागेच"
"नाव..म्हणजे काय..ही तर पृथ्वी आहे.."
मला थोडं विचित्र वाटलं.मी दुसरा प्रश्न केला.
"तुम्ही कोण..??.
"माणूस"
"ते तर मलाही माहीत आहे हो.पण तुमचं नाव काय,तुम्ही कुठून आलात, तुमचा गाव कोणता, हे सगळं"
"..नाव बिव काही माहीत नाही पण मी माणूस आहे आणि ही पृथ्वीचं माझी जागा,माझं गाव.."
आता तर माझ्या डोक्याला मुंग्या आल्या,
तरी मी नियंत्रण ठेवून विचारलं
"बर तुम्ही कुठल्या जातीचे,धर्म कोणता,देश कोणता."
तो शांतपणे म्हणाला,
"जात..धर्म..देश..ही काय भानगड आहे"
"तुम्हाला हे सर्व माहीत नाही"
त्याने अतिशय निरागसपणे सांगितलं
"नाही..."
मला वाटलं एकतर हा माणूस तरी पागल आहे किंवा मी तरी..माझं डोकच बधिर झालं होतं.काय करावं सुचतच नव्हतं..एवढ्यात माझ्या समोरून एक स्त्री गेली.ती सुद्धा पूर्णपणे निर्वस्त्र.
मी थोडासा नजर बाजूला वळवीत त्यांना विचारलं..
'मॅडम तुमचं नाव काय आहे..'
"नाव...म्हणजे.?
"अहो तुमची नेमकी ओळख काय, लोक कशामुळे ओळखतात..", मी चिडून म्हणालो
"स्त्री..फक्त स्त्री"
आता तर मला प्रचंड राग येत होता..
मी कंटाळून म्हटलं ठीक आहे..बर
"तुमची जात कोणती,धर्म कोणता, प्रांत कोणता..?"
"..हे सर्व काय आहेत..."..तेवढ्याच थंडपणे ती म्हणाली.
आता मात्र माझी सहनशक्ती संपली. डोक्यावर कुणीतरी घण मारत आहे असं वाटलं..हे सर्व जे सुरू होत ते खरंच माझ्या अकलनापलीकडे जाऊ लागलं.तरी सर्व आवरून मी शेवटचा प्रश्न विचारायच ठरवलं.
"बर ..तुम्ही नेमके करता काय..म्हणजे कुठल काम करता.?"..
मी कितीही नजर वळविण्याचा प्रयत्न केला तरी दृष्टी अधून मधून त्या स्त्रीच्या देहाकडेच जात होती..
ती स्त्री थेटपणे माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली..
"आम्ही..एकमेकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो.."
आता तर खरच मला आपल्याला भास होत आहे असं जाणवायला लागलं..हे सर्व भ्रम आहेत..हे सत्य नाही..मग मी थोडावेळ शांत राहायचं ठरविलं.
एवढ्यात ती स्त्री स्वच्छपणे मला म्हणाली,
"तुमचे डोळे खराब झाले का..की काहीतरी गेलं आहे"
"काय म्हटलत डोळे.."
"हो..मग असे सारखे सारखे इकडे तिकडे ,सैरभर का बघताय .."
ती सहजपणे बोलून गेली.
"नाहीतर.. डोळे तरी ठीकच आहेत माझे.."
अस बोलून मी डोळ्यांना हाथ लावला..मला काहीतरी जाणवायला लागल.खूप जड..भक्कम..कठीण अस.हो काहीतरी गेलं असावं..आणि एखाद्या अजस्त्र नागाने डंख मारावा तसा डंख डोळ्यांना बसला.मी पटकन डोळ्यावरून हाथ बाजूला केला.समोर अंधुकसा प्रकाश दिसत होता.मी डोळे नीट चोळले.बघितलं.घर होत.आणि मी बेडवर होतो.अरेच्या हे तर स्वप्न होत..साल काय भयंकर स्वप्न होत..बापरे.जीवच जाते काय अस वाटलं..सुटलो..पण झोपेचा पूर्ण खोळंबा झाला होता..
एवढ्यात आईचा आवाज आला..
"उठरे लवकर..कॉलेजमध्ये नाही जायच का.?..आज 15 ऑगस्ट आहे न"
- पी.निरंजन
दाह
माझ्या प्रतिमेचा एक आरसा तुझ्या घरी असु दे.मी नसेल ह्या जगात तेव्हा तू मनसोक्त आरशात बघ. आणि मला अंतर्बाह्य जाणून घे.मी.पुरुषोत्तम..निसटत्या क्षणाचा साक्षीदार. कुठल्याच कळपात न बसणारा.अंगावरचे सर्व वस्त्र काढून भणंगपणे हिंडणारा गोसावी.ज्याला कुठल्याच पानगळीचा त्रास होत नाही,असा एकलशुन्य स्वामी.पण मी तेव्हाही घनव्याकुळ होतो आणि आताही.बालपणी पावसाळ्याच्या दिवसात वीज गेली की आई मला पोटाशी घेऊन घट्टपणे बिलगे.त्यावेळी ती गर्भगळीत करणारी जीवघेणी भीती मला आजही पोळून काढते.मन अशाच अनामिक भीतीने गारठून गेलं आहे.एकाएकी आकाशात ढग जमावे आणि मरणाचा पाऊस पडावा तशी स्थिती झाली आहे.
तू सोडून गेल्यावर कितीतरी वेळ ह्या पावसात मी भीजत होतो.पावसाच्या पाण्यासोबत निथळत होतो.पण पाणी अंगावरून गेलं म्हणजे जखमेची दाहकता कमी होत नाही.उलट काळानुसार ही दाहकता वाढते आणि त्याचा ज्वालामुखी होतो.ग्रेसची कविता वाचताना हीच दाहकता अनुभवतो आणि परत स्वतःला जाळतो. जळण्या आणि जाळण्याच्या खेळात खरे मारेकरी कोण हेच मला आठवत नाही.वाळून गेलेल्या व्रणावरून काय अंदाज बांधता येईल म्हणा. परवा बाल्कनीत उभा असता मला माझ्याच मृत्यूचा विचार आला.कसा असेल माझ्या मृत्यू ? मनासारखं होणार का?..आणि काही रम्य कल्पना डोक्यात रेंगाळू लागल्या.
अशीच एक मद्यधुंद रात्र..मी टेबलावर..शेवटची कादंबरी लिहीत..माझ्या एका हाथात दारूचा ग्लास व दुसऱ्या हाथात सिगारेट...आणि रेडीओवरती..आबिदा परविनाचा दैवी सूर लागलेला..
" मेरा मुझमे कूछ नहीं
जो कुछ है सो तेरा
तेरा तुझको सौप दे
क्या लागे है मेरा..."
... गाण्याचे शेवटचे बोल कानावर पडावे आणि अलगदपणे मृत्यूने मला उचलून न्यावं.ना त्या विधात्याला त्रास व्हावा नाही मला.सगळं कसं संथ आणि शांत.
- पी.निरंजन
Sunday, July 4, 2021
काळोख
वेदना मर्त्य असते का?..कि,चिरंतन असते? मला दोन्हीही पोकळ वाटते.वेदना फक्त असते.तीच असणच तिला अस्तित्व प्राप्त करून देत.तिला बोलकी करत.वेदनेच वाहण मला जिवंतपणाच लक्षण वाटत.जसजशी ती शरीरातून झिरपत जाते तसतसा माणसाला आकार येतो आणि त्यातूनच त्याचा प्रवास निराकाराकडे सुरु होतो.
मी नैराश्याने ठार वेडा झालो आणि मला वेदना आवडू लागली.ठसठसणारी प्रत्येक जखम मला पुनर्जन्म देऊ लागली.काळीज चिरणारी प्रत्येक गोष्ट मला हवीहवीशी वाटू लागली.मला दान हव होत स्वत:ला जीर्ण करण्याच.स्वत:ला मुळापासून उपसण्याच...इंद्रायणी सोडून गेली आणि मी पहिल्यांदा जखमी झालो.भर पावसात ती गेली.मागे पडलेला अथांग असा वैराण प्रदेश ती सोडून चालली होती.ना तिला कसली भ्रांत होती नाही शोकांत.मात्र मी धारोष्ण रक्तात पडलेल्या कलेवरासारखा झालो.कोसळत्या पावसाकडे बघण्याशिवाय काहीच करू शकत नव्हतो.ती निघून जाणार असती तर मी प्रतिकार केला असता.पण ती सोडून जात होती.निघून जाणाऱ्या प्रवाशाला रस्ता माहित नसतो.मात्र सोडून जाणारा प्रवासी आधीच रस्ता आखून जातो.
मी दुसऱ्यांदा जखमी झालो.मात्र हि जखम पूर्ण देहाला नासवून गेली.अश्याच एका अशांत संध्याकाळी मी लिहायला बसलो.माझ्या एका हाथात लेखणी आणि दुसऱ्या हाथात सिगारेट व टेबलावर दारूची बॉटल..आणि समोर होता,घनदाट पसरलेला अमित काळोख.मी लेखणी हाथात घेतली आणि लिहू लागलो.एक शब्द,दोन शब्द...तीन...चार...पाच...सहा....सात..आणि लेखणी थांबली..बोट जणू लुळे पडले होते.एकही शब्द लिहीन जमेना.मी नुसत्या रेघोट्या मारत होतो.चित्र विचित्र रेखाटन काढू लागलो.काहीच सुचत नव्हत.मी गच्च डोक दाबल.आणि त्या भयाण काळोखाकडे पाहिलं.विराट काळोख..काळाकभिन्न.हाच काळोख माझ्या डोळ्यात साचला.कागदाचा पांढरा रंग आणि रात्रीचा काळा रंग डोळ्यात उतरला.आणि मेंदूत तुफान उसळल.विचारांचे जथेच्या जथे मेंदूला धडका देऊ लागले.कृष्णविवराच्या अवकाशात पसरलेली माणवाच्या चिरंतन दुखा:ला आश्वस्त करणारी अस्वस्थता.कुरुक्षेत्रात मरून पडलेल्या असंख्य देहाला अमर करणारी जाज्वल्य ज्योत.लसलसस्त्या दैन्यातून मुक्त करणारी भडाग्नी.पार्थिव आणि अपार्थिव सीमारेषेवरून हळूहळू सरकणाऱ्या कित्येक जीवघेण्या उल्का माझ्या शरीरात प्रवेश करू लागल्या.माझ्या शरीरात एक अनामिक चैतन्य दाटल.हा हा म्हणता म्हणता मला असंख्य भास पडू लागले.चित्रविचित्र स्वप्नाने माझे डोळे लाल झाले.नसा तटतटू लागल्या.साऱ्या शरीराला वणवा लागल आणि त्याच क्षणी मी वेडा झालो.ठार वेडा.
आयुष्यभर लिहिलेलं लिखाण मी जाळून टाकल.घरालासुद्धा आग लावली आणि पळत सुटलो.खूप जोराने.धावणारे पाय आणि उसळणारा श्वास ह्याखेरीज काहीच जाणवत नव्हत.
- पी.निरंजन
Monday, June 28, 2021
एक अनाहूत पत्र
डीअर मारिया,
तु खूप आठवतेस.असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी तुझ्या आठवणीच युद्ध उसळल नसेल.तुला जेवढ आठवावं तेवढी तु ताजी होतेस.मात्र हे ताजेपण मला उध्वस्थ करत.भग्न करत.आठवणीच्या श्रापातून मुक्त होण्याचा मूलमंत्र सापडेपर्यंत हि मालिका अशीच सुरु राहील.
आता तर रात्रसुद्धा जखमी नागिनीप्रमाणे डसते.काल रात्रीची गोष्ट.मी झोपण्यासाठी डोळे मिटले आणि नेहमीप्रमाणे डोक्यात विचारच वावटळ उठल.एक विचार आकाशात सोडलेल्या रॉकेटप्रमाणे मेंदूत घुसला कि आज मला झोपच येणार नाही.काय फालतू विचार होता .पण खरं सांगतो.रात्रभर वेड लागलेल्या रुग्णासारखा छताकडे पाहत राहिलो.सतरा वेळ खोलीमधून चकरा मारू लागलो.पळून जावस वाटत होत,लगेच कुठेही आणि अतिशय वेगाने कुणाचा तरी खून करावासा वाटत होता.पॉल गोगीणला मारायला हाथात सुरा घेऊन धावणाऱ्या व्हान गोघसारख.माणसाला थंड करणारी हिंसा असेल तर ती मी नक्की करेल.बाहेर अंधारच स्मशान झाल होत आणि माझ्या डोळ्यात रणांगणात सांडलेल्या रक्ताची विराट शांतता.डोक्यात उठलेल्या विचाराच्या जथ्याला मरण नाही,हे कळल.दुसऱ्या दिवशी मनोवैज्ञानिकाकडे गेलो.ठणठणीत बरा असल्याच प्रमाणपत्र दिल.शुद्ध फसवेगिरी होती.जगण्याच्या अपार्थिव हेतूला वणवा लावण्याचा प्रयत्न होता.पण मी स्वत:शी प्रामाणिक राहण्याचं ठरवील.
तुटलेल्या पैंजणातून निघणाऱ्या हुंद्क्याप्रमाणे माझ्यातील वेदना वाहू लागली.माणसातून उठण्याची प्रत्येक विधी मी पार पडली होती.आता वाट पाहण असह्य होत.हाका कानावर येण्याच्या आधी मी पळत सुटलो.कुठे कधीपर्यंत,कितीवेळ अश्या मर्यादेच वर्तुळ नव्हत.फक्त अपरिमित पसरलेल्या बेटावरच शेवाळ तेवढ बाकी होत.फक्त शेवाळ.मी हाथाने बाजूला ढकलीत त्या उमलत्या गर्भातून चालू लागलो.मारिया हे....अस चालण मला खूप आवडत.फक्त चालण.रस्तासुद्धा नको वाटत.तो जरी कुठे संपत नसला तरी त्याची सुरुवात कुठून तरी झालेलीच असते.
तुला माहित असेलच,पॅरिसच्या एका नाईटक्लबमध्ये पहिल्यांदा तू मला दिसलीस आणि मला निखाऱ्यावरून चालण पसंत पडल.तुझ्या हाथातील व्हिस्कीचा ग्लास मला मरणघरातून आणलेला लामणदिवा वाटतो.ज्याची एक ज्योत माझ्या पाठीच्या मणक्यात बांधलेली आहे आणि दुसरी ज्योत तुझ्या.तिकडे तू,तो ओठाला लावावा आणि इकडे मला मृत्यूने रसरसलेल चुंबन मिळावं..
“ कौनसी जंजीर थी
इन आंखो मे
शायद एक नशा था
जानलेवा...”
मारिया,खरच संपल्यानंतर येणारा मुक्तपणा कुठल्या स्वातंत्र्याचा समानार्थी शब्द असेल,मला वाटत नसेलच बहुतेक.
तुझाच,
..पुरुषोत्तम
-पी. निरंजन
Tuesday, March 30, 2021
दुःखाची संगती
काही दिवसापूर्वीची गोष्ट, मी बी ए. तृतीय वर्षाच्या मुलांना मराठी शिकवीत होतो.विद्याधर पुंडलिकांची 'चक्र' नावाची एकांकिका अभ्यासक्रमात होती.'चक्र' ही महाभारतातील विविध व्यक्तिरेखेवर आधारलेली एकांकिका आहे.त्यातील द्रौपदीची व्यक्तिरेखा माझ्या मनाला भयंकर चटका लावून गेली.द्रौपदीने म्हटलेली दोन वाक्य आजतागायत माझ्या काळजाला पोखरत आहेत.एके ठिकाणी द्रौपदी भीमाला म्हणते,"मला माझ्या दुःखाची संगती कळली पाहिजे".दुसर वाक्य,"शेवटी धर्म आणि अधर्मापेक्षा, कर्म आणि अकर्मापेक्षा दुःखच खर आहे".
ह्या दोन्ही वाक्यातून दुःख या आदिम व सनातन मानवी भावनेच अचूक विश्लेषण करण्यात आलेल आहे.पहिल्या वाक्यात द्रौपदी म्हणते,दुःखाची संगती.मला स्वतःला संगती हा शब्द फार म्हणजे फार आवडला.दुःखाच्या अर्थप्रकटीकरणासाठी संगती शिवाय अन्य कुठलाही शब्द तेवढा सखोल व परिपुर्ण वाटला नसता.ह्या एकाच शब्दाने मला पुंडलिकाप्रति आसक्ती निर्माण झाली.महाभारतात दोन अश्या व्यक्तिरेखा आहेत ज्या दुःख,वेदनेने सर्वाधिक होरपळुन निघाल्या आहेत.एक म्हणजे द्रौपदी,दुसरा म्हणजे अश्वथामा.महाभारतातील नृशंस युद्धाची निर्मिती सूडभावनेतून झाली.प्रत्येकाच्या मनात ह्या सुडाने हैदोस माजविला होता. द्रौपदीच्या मनातही हा सूड हळूहळू हाथपाय पसरत होता.मात्र ह्यामागे तिच्या काळजाला ज्याअसंख्य जखमा झाल्यात त्या कारणीभूत आहेत.भरसभेत द्रौपदीची झालेली विटंबना आणि युद्धाच्या अखेरीस क्रूरपणे अश्वत्थाम्याने द्रौपदीची मारलेली पाचही मुलं. ह्या सर्व घटनेमुळे द्रौपदीच्या वाट्याला आलेलं दुख हे अतिशय संहारक आणि भेदक होत.तिच्यातल्या स्त्रीत्वाचा आणि मातृत्वाचा निर्घृण खून करण्यात आला.त्यामूळेच द्रौपदी पिसाळली, दुःखाने अंध झाली.शेवटी तिने ह्यावर उतारा म्हणून भिमाकडे अश्वत्थाम्याचा सूड मागितला.आणि ह्यातूनच अश्वत्थाम्याला कधीही भरून न निघणारी लसलसती झखम झाली.हा सर्व विनाश झाल्यावर बराच अवकाश निघून गेला,काळ निघून गेला.आता द्रौपदीला नव्याने काही प्रश्न पडत अहेत.ती म्हणते,"मला खरंच माझ्या दुःखाची संगती कळली का?",मला जे मिळालं ते समाधानकारक आहे का? माझ्या दुःखाच खरोखर निवारण झालं का? आणि ह्या तडफडण्याला एकच उत्तर मिळाल..'नाही'.
आता मला प्रश्न पडतो,खरंच काय असेल दुःखाची संगती? कोणता चेहरा आहे दुःखाचा?...आणि असंख्य विचाराच्या मंथन केल्यावर काही धागेदोरे हाथी लागतात.जे उत्तराच्या जवळ पोहचवितात.दुःखाच्या उत्पत्तीनंतर माणूस ते निवारणाच्या मागे लागतो. त्यावर उपाय शोधतो. मात्र ह्या भानगडीत तो दुःखाला पुरेपूर समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. ह्यामुळेच दुःख नेहमीकरता दूर होत नाही,तर ते रूपांतरित होत.पाण्यासारख.अवस्था बदलतात तीव्रता तेवढीच राहते.म्हणूनच जस एखाद्या आजारा मागील कारणे शोधल्यास त्या आजाराचं योग्य निदान करता येत.तसच दुःखाची नेमकी कारणे आणि त्याच स्वरूप कळलं तरच त्याचा नेमका अर्थ कळतो.इथं द्रौपदीला तिच्या दुःखावर उपाय नको होता.तिला फक्त तीच दुःख व त्याचा अर्थ कळायला हवा. त्यासाठीच ती जीवाचा आकांत करत होती. प्रत्येक दुःखाला, वेदनेला विशिष्ट खोली,मर्यादा व वेग असतो.त्या दुःखाची तीव्रता आणि सीमा माणसाला दुःखाच्या अधिक जवळ नेते.प्रेमात येणारा विरह,प्रियजनाचा मृत्यू,शारीरिक जखमा,अपयश ह्या सर्वतून उद्भवणाऱ्या प्रत्येक दुःखाला विशिष्ट असा आकार व खोली आहे. प्रेमातून निर्माण झालेल विरहाच दुःख दोघांसाठी सारखं आणि समप्रमाणात असत.मात्र एकतर्फी प्रेमातून आलेलं दुःख एकापूरत मर्यादित असत.तसच मृत्यूतून निर्माण होणार दुःख,त्याला ना मर्यादा आहे नाही ते चिरंतन आहे, ते फक्त अटळ आणि शाश्वत आहे.अश्या प्रत्येक दुःखाच्या विविध पातळ्याच्या रुपरेषेवरून दुःखाच एक प्रतिबिंब तयार होत.आणि मग आपण ठामपणे सांगू शकतो की हाच आहे दुखाचा मूळ अर्थ आहे.
ह्या सर्व भौतिक पाठपुराव्याचा कसून विचार केला त्यावर सखोल चिंतन मंथन केल्यानंतर,आता ह्यापुढचा प्रश्न उपस्थित होतो,मग दुःख निवारण्याचा उपाय कोणता? परत एकदा विचारांचे घोडे धावायला लागतात.आणि बऱ्याच वैचारिक घुसळणीतून काही सूत्र माझ्या हाथी लागले.आणि मला दुःखाच एक नवीन रूप समोर दिसायला लागल.वेगाने एक विचार डोक्यात उसळला दुःखाच्या अटळ,अनाकलनीय,व अविनाशी ह्या गुणधर्मातच त्याच्या मुक्तीचा मूलमंत्र दडलेला नसेल का?.आणि मग मला द्रौपदीच दुसरं वाक्य आठवलं," धर्म आणि अधर्मापेक्षा व कर्म आणि अकर्मापेक्षा दुःखच खर आहे".इथं मला तीव्रतेने बुद्ध आठवला.आणि शतकानुशतके चालत आलेल्या ह्या मानवी वेदनेचा संग्राम निश्चितपणे थांबवता येईल असं वाटलं.
महाभारतातील युद्धात प्रत्येकजण अधर्माने वागला .सर्वांनी वाईट व अनैतिक मार्गाचा अवलंब केला. पण एवढं सगळं होऊनसुद्धा कुणालाच आत्मिक समाधान लाभलं नाही.वाट्याला आलं ते रक्ताने माखलेल भळभळत दुःख.ह्यातूनच द्रौपदीला शाश्वत सत्याचा साक्षात्कार झाला.आणि त्याच्याच प्रत्यय म्हणजे तीन उद्गारलेलं दुसरं वाक्य.दुःखाच एकमेव,अंतिम,चिरंतन व अटळ असणं हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.बुद्धाने आपल्या जगण्यातून, भोगातून हेच सांगितलं. तेच सत्य व्यासाने अधोरेखित केल आहे.आता मला प्रश्न पडतो जर दुःख अंतिम, अटळ व चिरंतन असेल तर त्यावर चिरकाल टिकणारा उपाय, इलाज असेल का? असू शकतो का? आणि त्याच प्रामाणिक उत्तर आहे,"नाही".दुःखाच अंतिम,अटळ व चिरंतन असणंच त्याच्या अस्तित्वाची सीमारेषा निश्चित करत.आणि एक ज्वलंत व कठोर सत्य हाथात येत,ते म्हणजे दुःखावर अंतिम उपाय नाही. तो असूच शकत नाही,दुःख हे रूपांतरित होत ते नष्ट होत नाही. जसा अश्वत्थाम्याला अमरत्वाचा वरदान असतो तसाच दुःखालाही अमरत्वाचा वरदान लाभलेला आहे.त्यामुळे दुःख हे दूर करण्यासाठी नसून ते मनसोक्त भोगण्यासाठी,जगण्यासाठी आहे.जस सुखाशी आपण आत्म्याच्या देठापासून समरस होतो तसच दुःखाशी समरस व्हायला हवं.तेव्हा कुठं हा जीवन नावाचा जुगार आनंदाने खेळता येतो. खुप दीवसाआधी लिहिलेलं माझंच एक वाक्य मला आठवत ,'प्रवासाचा शेवट न होणं हेच अंतिम सत्य आहे'.ह्याप्रमाणेच दुःखाच्या अपूर्णत्वा मध्येच त्याच्या पूर्णत्वाची संजीवनी दडलेली आहे..आणि हीच दुःखाची एकमेव व शाश्वत संगती आहे..
- पी.निरंजन
Wednesday, December 23, 2020
कट्यार
संपल सार...अखेरचं मरण सुद्धा लवकर आलं... किती जगायच होत मला किती पहायचं होत... पण सार मातीमोल झालं...स्वतःलाच चिरताना कित्येकाचे गळे कापलेत मी...माझं मलाच माहीत नाही...मी फक्त धावत होतो... खूप दूर आलो...आता कुणीच माझं नाही...कदाचित मीसुध्दा कुणाचा काय होतो...नसतोच कुणी..कुणाचा...सर्वजण आपापल्या डोक्यात कट्यार खुपसून येतो...कट्यार आत असेपर्यंत तो जिवंत असतो...वेदना वहात असते..रक्त ठिबकत असतं.. पण एकदा का जखम भरली की कट्यार आपोआप गळून पडते...कट्यारीच निखळणच देहासाठी विषारी बनतं... आणि हळूहळू देह कुजायला लागतो...आणि कट्यार मातीत पडून सुद्धा चमकायला लागते...
प्रश्न
दिवसागणीक सरणारी रात्र आता मला छळते आहे. इतका मनस्ताप कधीच मला झाला नव्हता. संध्याकाळ झाली की मी लिहायला बसायचो आणि सोबत प्यायलासुध्...
-
दिवसागणीक सरणारी रात्र आता मला छळते आहे. इतका मनस्ताप कधीच मला झाला नव्हता. संध्याकाळ झाली की मी लिहायला बसायचो आणि सोबत प्यायलासुध्...
-
माझ्या प्रतिमेचा एक आरसा तुझ्या घरी असु दे.मी नसेल ह्या जगात तेव्हा तू मनसोक्त आरशात बघ. आणि मला अंतर्बाह्य जाणून घे.मी.पुरुषोत्...
-
वेदना मर्त्य असते का?..कि,चिरंतन असते? मला दोन्हीही पोकळ वाटते.वेदना फक्त असते.तीच असणच तिला अस्तित्व प्राप्त करून देत.तिला...